पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 22 आरोपी मागील काही वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तर शहराच्या हद्दीत राहणारे पाच कैदी तुरुंगातून सुट्टीवर आल्यावर तुरुंगात परतलेच नाहीत. त्यामुळे ‘ते’ सध्या काय करतात ? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवनीत बाळकृष्ण नायडू, दीपक दत्तू थेऊरकर, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीपक रामचंद्र चावरिया, जितेंद्र तानाजी माने, आणि निगडीच्या हद्दीतील सुनील अनंत शिंदे हे पाच कैदी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत आहेत. यातील नायडू हा अभिवचन (फर्लो) रजेवर तर, इतर चौघे संचित (पॅरोल) रजेवर बाहेर आले होते. मात्र, ते पुन्हा कारावासात गेलेच नाहीत. पिंपरी-चिंचवड मधील या पाच कैद्यांना आता बंदी फरारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
अपर पोलीस महासंचालक कार्यालय तसेच कारागृह प्रशासन यांच्याकडून राज्यातील बंदी फरारी कैद्यांच्या अटकेसाठी पाठपुरावा सुरु असतो. शहरामध्ये गुन्हे शाखा तसेच इतर गोपनीय विभाग गुन्हेगारांवर लक्ष ठेऊन असतात. तरी देखील दशके उलटूनही हे कैदी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. या फरार कैद्यांच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करून फरार कैद्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
फरार कैद्यांना शोधण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक नेमण्यात आले. गुन्हे शाखा अथवा अन्य विभागाने या कैद्यांना पकडले, तर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैदी सापडतील त्या ठाण्यातील कर्मचा-यांवर कारवाई होणार असल्याचे देखील अपर आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मरगळ झटकून कामाला लागले. सर्वच अधिकारी आणि कर्मचा-यांसमोर पहिला प्रश्न उपस्थित झाला की, ‘ते सध्या काय करतात?’
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांवर आरोप निश्चित झाल्यास त्या आरोपीला शिक्षा होते. पण आरोप निश्चित झाल्यानंतर देखील आरोपी अटक नसेल तर न्यायालय अशा आरोपींना ‘फरारी’ घोषित करते. पिंपरी-चिंचवड शहरात असे 22 फरारी आरोपी आहेत. त्यामध्ये चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, आळंदी, वाकड, देहूरोड, सांगवी, पिंपरी पोलीस ठाण्यातील आरोपी फरार आहेत. त्यामध्ये सात आरोपी खुनाच्या गुन्ह्यात फरारी आहेत.
बंदी फरार आरोपींमध्ये भर पडण्याची शक्यता
कोरोना काळात कारागृहातून शेकडो कैद्यांना सक्तीच्या सुट्टीवर सोडण्यात आले. कोरोना साथ आटोक्यात आल्यानंतर तसेच कैद्यांना दिलेली सुट्टी संपल्याने त्यांना पुन्हा कारागृहात बोलावण्यात आले. मात्र अनेकजण प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून बाहेर फिरत आहेत. त्यातील काहींनी तर सुट्टीच्या कालावधीत गुन्हे केल्याचेही उघडकीस आले. सुट्टीवर आलेल्या कैद्यांची यादी तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. हे आरोपी कारागृहात परतले नाहीत, तर बंदी फरार आरोपींच्या संख्येत भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
कैदयांना मिळतात अभिवचन आणि संचित रजा
गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आपल्या कुटुंबीयांमध्ये जाता यावे. तसेच त्याचे सामाजिक संबंध स्थापित राहावे यासाठी अभिवचन (फर्लो) आणि संचित (पॅरोल) अशा दोन प्रकारच्या रजा मिळतात. अभिवचन रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. त्यासाठी त्याला तुरुंग प्रशासनासमोर कोणतेही कारण सादर करावे लागत नाही. अभिवचन रजा ही शिक्षेतली सूट समजली जाते.
संचित रजेसाठी कैद्याला तरुंग प्रशासनाला सबळ कारण द्यावे लागते. जवळचे नातेवाईक आजारी असतील, घरात एखादा महत्वाचा कार्यक्रम असेल अशा महत्वाच्या कामासाठी कैदी संचित रजेसाठी अर्ज करून शकतो. सुनावण्यात आलेल्या शिक्षेचा काही कालावधी पूर्ण केल्यावर तसेच कैद्यांचे वर्तन आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून या अर्जावर विचार करून रजा दिली जाते. 15 दिवसांपर्यंत तुरुंग प्रशासनाला संचित रजा देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त म्हणजे 30 दिवसांपर्यंतची रजा विभागीय आयुक्त देऊ शकतात.