परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढविलेल्या कंपन्या काय सांगतात? (भाग-१)
कंपनीचं नांव, परकीय गुंतवणूकदारांचा डिसेंबर २०१७ च्या अखेरीस त्या कंपनीत असलेला हिस्सा, डिसेंबर २०१८ च्या अखेरीस असलेला हिस्सा, त्यांमधील फरक (% मध्ये) व त्या कंपनीचा मागील आठवड्याचा बंद भाव.
राजू इंजिनीअर्स, अल्ट्रामरिन अँडपिगमेंट्स व कॉन्फिडन्स पेट्रो या अशा कंपन्या आहेत, ज्यांमध्ये मागील आर्थिक वर्षात कोणतीही गुंतवणूक नव्हती, परंतु २०१८ अखेरीस अनुक्रमे ०.३३, ०.४४ व ४.९८ टक्क्यांपर्यंत आपला हिस्सा वाढवला आहे. परकीय गुंतवणूकदारांची सर्वांत लाडकी कंपनी आहे ती म्हणजे, एचडीएफसी. जिच्यात सर्वांत जास्त हिस्सा हा परकीय गुंतवणूकदार संस्थांचा आहे परंतु मागील वर्षी त्यात थोडीशी घट झालीय, म्हणजे डिसेंबर २०१७ च्या अखेरीस असलेला ७४.८० % हिस्सा आता ७२.२० टक्क्यांवर आहे. यांव्यतिरिक्त, भारत फायनान्शिअल, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, इंडसइंड बँक, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स, ॲक्सिस बँक, अपोलो हॉस्पिटल्स व बिर्ला सॉफ्ट इ. कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा हिस्सा हा ४५ टक्क्यांपर्यंत आहे तर तर त्याखालोखाल २० टक्क्यांपेक्षा जास्त परकीय गुंतवणूकदारांचा हिस्सा असणाऱ्या भारतीय कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत, कंसातील आकडा हा त्या त्या कंपनीतील परकीय गुंतवणुकीचा हिस्सा दर्शवतो. टीमलीज सर्व्हिसेस (४४.१६%), ज्युबिलंट फूड (३९.४१%), इंडियाबुल्स व्हेंचर्स (२६.३%), सनटेक रिअल्टी (२४.९४%), ज्युबिलंट लाईफ सायन्स (२४.८९%), टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (२४.७२%), जेएसडब्लू होल्डिंग्स (२४.५%), इंडियाबुल्स इंटिग्रेटेड सर्व्हिसेस (२३.३८%), एयू स्मॉल फायनान्स बँक (२२.३९%), शंकरा बिल्डिंग (२२.२९%), महानगर गॅस (२१.६१%), अमरा राजा बॅटरीज (२०.६५%), अदानी ट्रान्समिशन (२०.४४ %), इ.
यावरून आपणांस आढळून येतं की गुंतवणूक केल्या गेलेल्या कंपन्यांमध्ये कोणतेही विशिष्ट क्षेत्र असं दिसून येत नाहीय. आता, परकीय गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना कोणते मापदंड लावलेत अथवा निकष तपासलेत आणि कोणती स्ट्रॅटेजी वापरलीय याचा थांगपत्ता लागणं अवघड आहे. त्यामुळं आपण एवढंच म्हणू शकतो की, चांगला व्यवसाय करणारी कंपनी जिचं मूल्य हे आकर्षक आहे, म्हणजे अवास्तव नाहीयेय, अशी कंपनी निवडणं हे वावगं ठरणार नाही..
पुन्हा एकदा ऐतिहासिक टप्पा
मागील आठवडा हा भारतीय शेअरबाजारासाठी ऐतिहासिक ठरला तो म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी ३ एप्रिल रोजी अनुक्रमे, ३९२७०.१४ व ११७६१ या सर्वोच्च भाव पातळ्या नोंदवल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणानुसार ०.२५% दरकपात होणार हे बाजारानं जणू गृहीतच धरलं होतं व त्यानुसार बाजारात मागील पतधोरणापासून म्हणजे ७ फेब्रुवारी पासून तेजीचंच वातावरण होतं. त्यानुसार अपेक्षापूर्ती झाल्यानंतर अपेक्षेनुसार बाजारात थोडी नफावसूली झाली व निर्देशांकात थोडी घसरण झाली. परंतु शुक्रवारी बाजारानं आलेली मरगळ झटकून टाकत पुन्हा उर्ध्व दिशेस कूच केलं. आता या आठवड्यात बाजार त्याचेच विक्रम मोडीत काढतोय, का त्या विक्रमास मान देऊन काही काळ ताटकळतोय हे पाहणं रोचक व सूचक असेल. कारण जुने नियम तोडून नवनवीन इतिहास घडवणं हे तेजीवाल्यांसाठी सुखावहच असेल, नाही का ?