पुणे – मागील वर्षाच्या स्वच्छ शहर स्पर्धेसाठी आम्ही पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्यानंतरही आमचे स्वच्छतेचे मानांकन 11 वरून थेट 37 वर गेले आहे. त्यामुळे आम्ही केंद्र शासनालाच पत्र पाठवून आमच्याकडून नेमक्या काय चुका झाल्या, कुठे आमचे गुणांकण कमी पडले याबाबत माहिती देण्याची विनंती केली असून त्यासाठी केंद्राला पत्रही पाठविले असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. “स्वच्छ सर्वेक्षण-2020’साठी महापालिकेकडून करण्यात येत असलेले नियोजन आणि या सर्वेक्षणात झालेले बदल याची माहिती देण्यासाठी आयुक्त राव यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
आयुक्त राव म्हणाले, महापालिकेकडून मागील वर्षाच्या सर्वेक्षणासाठी सर्वोत्तपरी तयारी करण्यात आली होती. त्यात प्रत्यक्ष परिक्षकांनी केलेले सर्वेक्षण, नागरी सहभाग यासह अनेक घटकांमध्ये महापालिकेची कामगिरी चांगली होती. मात्र, केवळ कागदोपत्री बाबी पूर्ण करण्यात पालिकेस अपयश आल्याने शहराचे मानांकन मोठ्या प्रमाणात घसरले आहे. या शिवाय, अनेक बाबींमध्ये पालिकेस कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या कमजोर बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी थेट केंद्र शासनाला पत्र पाठविले असून आम्हाला ज्या घटकांमध्ये कमी गुणांकन झाले आहे. त्याबाबत माहिती मिळावी, यासाठी पत्र पाठविले आहे. अशा प्रकारचे पत्र पाठविणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका असेल, असा दावा आयुक्तांनी यावेळी केला.
या बैठकीत आयुक्तांनी या सर्वेक्षणाचे सादरीकरण केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या सूचनाही या अभियानासाठी मागविण्यात आल्या असून जनजागृतीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आम्ही धडा घेतला…
मागील सर्वेक्षणात आम्ही कमी पडलोय याचा धडा आम्ही घेतला असल्याची कबुली यावेळी आयुक्तांनी दिली. मागील वर्षाच्या सर्वेक्षणात पुण्याचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये यावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, कागदोपत्री पूर्तता करण्यात आम्ही कमी पडलो. केवळ निकषांएवढेच कागद आम्ही सादर केले. तर अनेक शहरांनी त्यापेक्षाही अधिक कागदपत्रे सादर केली. त्यामुळे आमचे मानांकन कमी पडल्याचे ते म्हणाले.