मुंबई – गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना ओबीसी आरक्षणाचे प्रकरण जेव्हा सुप्रीम कोर्टात सुरू होते, त्यावेळी तत्कालीन भाजप सरकारने काय केलं? तत्कालीन भाजप सरकार अपयशी ठरल्यामुळेच ओबीसी आरक्षण मिळू शकले नाही. ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी मागच्या पाच वर्षात भाजप सरकारने काहीतरी केलं असतं तर आज 12 कोटी जनतेला भाजप विषयी विश्वास वाटला असता. मात्र महाविकास आघाडी सरकार ओबीसींना आरक्षण मिळवून देण्याचा पुर्ण प्रयत्न करणार असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
आठवड्याचा जनता दरबार घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आले असताना ओबीसी आरक्षणाबाबत माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले की, न्यायालयात साक्षीपुरावे करत असताना इंम्पिरिकल डेटा, अहवाल किंवा ट्रिपल टेस्ट करण्यासंदर्भात तत्कालीन भाजप सरकारने काहीच केले नाही. म्हणून तर आमच्या सरकारच्या काळात निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आघाडी सरकार काम करत आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.