सातारा -करोनाबाधितांवरील उपचारांवर होत असलेल्या खर्चाबाबत खा. उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करोनाच्या काळात बेडस्, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवत होता. खरे तर आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीचे पैसे कुठे गेले, याचे उत्तर केंद्र व राज्य शासनाने दिले पाहिजे. राज्यकर्त्यांना बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना उदयनराजेंनी तुळजाभवानीस केली. हा सर्व खटाटोप पैशांसाठी चालला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
विजयादशमीनिमित्त जलमंदिर पॅलेस येथे खा. उदयनराजे यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. करोनाच्या संकटामुळे यंदा सीमोल्लंघनाची शाही मिरवणूक रद्द करण्यात आली. करोनाच्या सावटामुळे सण साजरे करता येत नसल्याची खंत उदयनराजेंनी व्यक्त केली. ते म्हणाले, करोनाने लोकांचे सर्व काही हिरावून घेतले आहे. प्रत्येकाने खूप काळजी घ्यावी. खासदार आणि आमदारांचा दोन वर्षांतील संपूर्ण निधी सरकारांनी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. मी केवळ राज्यपुरते बोलत नाही. करोनाच्या संकटात बेडस्, व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत होती. मग, खासदार, आमदारांचा स्थानिक विकास निधी कुठे गेला, याचे उत्तर केंद्र व राज्य शासनाने दिले पाहिजे. आई भवानी राज्यकर्त्यांना बुद्धी दे! ज्यांनी निवडून दिले,
त्यांची काळजी राज्यकर्ते करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. करोनाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिल्याने अधिकारी लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेत नाहीत. प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या महसूल विभागाचा आरोग्य यंत्रणेशी काय संबंध? डॉक्टरांच्या वेतनात वाढ करावी. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मरत आहेत. काही जण फक्त पैशाचा विचार करतात तर मी भावनेचा विचार करतो. हे असेच चालत राहिले तर सामान्य जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. मनाला वेदना होतात म्हणून हे बोललो, असे उदयनराजेंनी नमूद केले.