अमित शहा: गडचिरोलीला नक्षलवादमुक्त बनवणार
गडचिरोली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कुटूंबातील चार पिढ्यांनी 70 वर्षे देशावर राज्य केले. त्या राजवटीत त्यांनी आदिवासींसाठी काय केले, असा सवाल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी शहा यांची गडचिरोली जिल्ह्यात सभा झाली. त्यावेळी त्यांनी राहुल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शाब्दिक तोफ डागली. महाराष्ट्र आणि विदर्भासाठी काय केले त्याचा हिशेब पवार आणि राहुल यांनी द्यावा. आमची पाच वर्षांची कामगिरी त्यांच्या पन्नास वर्षांच्या कारभारापेक्षा कित्येक पटीने चांगली आहे, असा दावा शहा यांनी केला.
त्यांच्या सरकारांनी काय केले या मुद्द्यावर भाजयुमोच्या अध्यक्षाशी जाहीर चर्चा करण्याचे आव्हानही त्यांनी पवार यांना दिले. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. त्या जिल्ह्याला आम्ही पाच वर्षांत नक्षलवादमुक्त बनवू, अशी ग्वाही शहा यांनी पुढे बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित बनवला आहे. त्यांच्यामुळे काश्मीर कायमस्वरूपी भारताशी जोडला गेला आहे, असे म्हणत त्यांनी 370 कलम हटवण्याचा संदर्भ दिला.