पुणे – जगभरात करोनाची साथ अद्यापही पूर्णपणे संपलेली नाही आणि आता बर्ड फ्लूच्या साथीने लोकांची चिंता वाढली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या घटना वाढताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी कोंबड्या आणि पक्षांचे अकस्मिक मृत्यू होत आहेत. बर्ड फ्लूचा प्रसार वाढू नये यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्याचे आवाहन केंद्र सरकराने राज्यांना केले आहे. बर्ड फ्लूची लागण पाळीव पक्षांमध्ये आणि त्यातील काही स्टेनचा प्रादुर्भाव माणसांमध्ये होऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी दिलेला आहे. प्रश्न असा आहे की, हा बर्ड फ्लूची लागण भारतात अधूनमधून का होत असते?
बर्ड फ्लू ( bird flu ) म्हणजेच एवियन एन्फ्लुएन्झाचा प्रादुर्भाव भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये अनेक दशकांपासून होत आलेला आहे. भारतात त्याचा पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला तो 2006 साली. 2012 साली पुन्हा एकदा या साथीला तोंड द्यावे लागले. तिसऱ्यांदा 2015 मध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला आणि आता 2021 मध्ये पुन्हा एकदा या रोगाची साथ पक्षांमध्ये दिसू लागली आहे.
भारतात हा रोग प्रामुख्याने हिवाळ्याच्या दिवसात पसरतो. सप्टेंबर-ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत या रोगाच्या घटना समोर येत राहतात. याच कालवधीत जगभरातून भारताच्या विविध भागांमध्ये स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर येत असतात. पक्षांचे हे स्थलांतर बर्ड फ्लू पसरण्याचे एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर या रोगाचे संक्रमण करणाऱ्या वस्तुंच्या माध्यमातूनही तो पसरतो.
पशुपालन व दुग्ध विकास मंत्रालयाच्या मते भारतात बर्ड फ्लू प्रामुख्याने स्थलांतरित पक्षांमुळे पसरतो. त्यानंतर परदेशातून येणाऱ्या व्यक्ती किंवा तिचे कपडे, सामान याद्वारे बर्ड फ्लूच्या विषाणूचा प्रसार होतो. केंद्र सरकारने 2005 मध्येच बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी कृती योजना बनवली आहे. त्यामध्ये सुधारणा करून त्यानुसार काम केले जाते.
बर्ड फ्लूची लागण झालेली पहिली व्यक्ती 1997 मध्ये सापडली होती. मात्र, माणसाकडून माणसाला बर्ड फ्लू होण्याची पहिली घटना 2003 मध्ये चीनमध्ये समोर आली होती. त्याआधी माणसे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे एच7एन9 या विषाणूच्या प्रसाराचे कुठलेही पुरावे मिळाले नव्हते. फक्त पक्षांशी थेट संपर्क येणाऱ्यांना या विषाणूद्वारे बर्ड फ्लू होण्याचा अधिक धोका असतो.
बर्ड फ्लू विषाणू पक्षी आणि कोंबड्यांसाठी जीवघेणा ठरतो. त्याचबरोबर माणसासाठी देखील हा जीवघेणा ठरू शकतो. बर्ड फ्लूची लागण झालेली पहिली व्यक्ती 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये सापडली होती. तेव्हापासून या विषाणूची लागण झालेल्यांपैकी 60 टक्के व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे करोनाप्रमाणेच या विषाणूपासूनही लांब राहण्याची गरज आहे.