नवी दिल्ली – लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपींबाबत आणि त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे की नाही याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच कोण आरोपी आहेत, ज्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि तुम्ही त्यांना अटक केली आहे की नाही याची माहिती उद्याच सादर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश राज्य सरकारला दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी लखीमपूर खेरी घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमाणा यांच्या खंडपीठापुढे आज (गुरुवारी) सुनावणी पार पडली. उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरी घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
लखीमपूर खेरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सुनावणी करताना उत्तर प्रदेश सरकारला शुक्रवारपर्यंत स्टेटस् रिपोर्ट दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारीच होईल. याप्रकरणी सविस्तर स्थिती अहवाल सादर करावा, ज्यात ज्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे आणि पीडित कोण आहेत त्यांच्याही नावाचा समावेश असावा, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
याशिवाय आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली आहेत आणि तपासाची स्थितीही अहवालात सांगण्यात आली पाहिजे, असेही आदेशत म्हटले आहे. यासोबतच न्यायालयाने राज्य सरकारला मृत शेतकरी लवप्रीत सिंह यांच्या आईला योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.