जि. प. अध्यक्षांचा अधिकाऱ्यांना प्रश्न; तत्काळ माहिती सादर करण्याची सूचना
पुणे – नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालये उभारण्यात येणार आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून या कामाबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांना अधिकाऱ्यांना जाब विचारत आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती, येणाऱ्या अडचणी आणि पुढे किती दिवसांत काम सुरू करणार याची सविस्तर माहिती सादर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून हे शौचालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. कारण जिल्ह्यात अनेक तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ आहेत. त्यांना भेटी देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या मोठी आह; परंतु त्याठिकाणी सुलभ शौचालयांची सुविधा नसल्यामुळे लघुशंकेसाठी नागरिकांना आड्योशाला जावे लागते. त्यामध्ये महिलांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील “अ’ दर्जाची तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ, मुख्य बाजारपेठा आणि पालखी मार्ग याठिकाणी कायमस्वरुपी सार्वजनिक सुलभ शौचालयसंकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून तयार केला होता. त्यामध्ये 76 शौचालयेसंकुल उभारण्यात येणार होती.
पूर्ण प्रस्तावातील शौचालयांसाठी अंदाजे बारा कोटींचा खर्च अपेक्षित होता. या प्रस्तावाला दीड वर्ष होऊन गेले, तरीही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याबाबत आढावा घेतला असता, “निधीअभावी ही कामे थांबली असून काही ठिकाणी जागांच्या समस्या आहेत. प्राथमिक मंजुरी मिळूनही सुलभ शौचालयाचा प्रस्ताव बारगळला आहे. त्यामुळे या कामामध्ये स्वत: अध्यक्षांनी लक्ष घातले.