मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा वाढू नये यासाठी लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करू नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
यावेळी त्यांनी मास्क न वापरण्यात कसलं शौर्य? असेही ते म्हणाले. असं म्हणत त्यांनी मनसेलाही टोला लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्यावरुन, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले,’ अनेकजणांना असं वाटतंय, ये मास्क का लावतोय तू. पण, मास्क न लावण्यात शौर्य काय, मी मास्क वापरणार नाही, मग काय शूर आहेस का? असा प्रश्न विचारत खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. मास्क घालण्यात लाज कसली, मास्क न लावणे यात शूरता नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
दरम्यान, ”मुख्यमंत्री साहेब, तुमचं ऐकलं, आता आमचं ऐका…किंबुहना ऐकाच ! उद्या सकाळी 11 वाजता फेसबुक लाईव्ह.”, असे ट्विट देशपांडे यांनी केलंय. म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या भाषेचा आपल्या ट्विटमध्ये उल्लेख करत, त्यांनी 11 वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचं सूचवलं आहे.