मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला होता. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती आता समोर आली आहे. याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आल होत. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 16, 2021
“राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता” असे म्हणत निलेश राणेंनी हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा अशी मागणीही केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का? हे ही पाहावं लागेल असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. “हत्या की आत्महत्या याची चौकशी केली पाहिजे. ठाकरे सरकारने आतापर्यंत सगळ्यांना वाचवण्याचे काम केले आहे. परंतु आता नेत्यांना वाचवण्याचे काम थांबवायला हवे. नेत्यांच्या कृत्यांची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी” असे निलेश राणे म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असे म्हटले आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. “पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड अडकले म्हणूनच त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच SSR आणि दिशा सालियन प्रकरणात देखील आदित्य ठाकरेचं नाव घेण्यात आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री यांनी स्वतःच्या मुलाला वाचवलं” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. तसेच भाजपाच्या नेत्यांना या सर्व प्रकरणात धमक्या आल्या. मात्र मला त्यांना सांगायचंय महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, एक ना एक दिवस यांचं सरकार महाराष्ट्रामधून जाणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.