पुणे – पश्चिम महाराष्ट्रातील 22 लाख 62 हजार घरगुती, आस्थापना आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडे 1,267 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती भरावी अन्यथा वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.
गेल्या वर्षी मार्च अखेरीस पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, आस्थापना आणि औद्योगिक ग्राहकांकडे केवळ 381 कोटी रुपयांची थकबाकी होती. आता ती वाढून 1,267 कोटी 25 लाख रुपये झाली आहे. त्यामध्ये 19 लाख 75 हजार 442 ग्राहकांकडे 833 कोटी 37 लाख रुपये, 2 लाख 41 हजार 951 आस्थापना ग्राहकांकडे 244 कोटी 17 लाख रुपये आणि 45 हजार 114 औद्योगिक ग्राहकांकडे 189 कोटी 70 लाख रुपयांची थकबाकी आहे.
वाढत्या थकबाकीमुळे महावितरणपुढील आर्थिक कोंडी वाढली आहे. परिणामी नाईलाजास्तव थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी चालू आणि थकित वीजबिल भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
– अंकुश नाळे, पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक, महावितरण
जिल्हा थकबाकीदारांची संख्या थकबाकी (रुपयांत)
पुणे 10,49,341 687 कोटी 61 लाख
कोल्हापूर 4,36,038 231 कोटी 15 लाख
सांगली 2,60,798 120 कोटी 43 लाख
सोलापूर 3,26,555 164 कोटी 83 लाख
सातारा 1,89,775 63 कोटी 23 लाख
एक लाख थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडला
थकित वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून केली जात आहे. गेल्या फेब्रुवारीपासून पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 338 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामध्ये पुण्यातील 65,179, कोल्हापूर 5,148, सांगली 6,943, सोलापूर 9,876 आणि सातारा जिल्ह्यातील 14,192 थकबाकीदारांचा समावेश आहे.