कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शहरात महापुर आला, त्यामुळे मोठया प्रमाणात नागरिकांचे घरांचे नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी येवून ज्या नागरिकांची घरांची पडझड झाली आहे, त्यांना घरफाळ्यांमध्ये 100 टक्के आणि घरात पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे, अशा मिळकतदारांना 50 टक्के सवलत द्यावी, अशी सूचना स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आयुक्तांकडे केली आहे.
कोल्हापूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापुर येवून शहरावर मोठे संकट आले आहे. अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात शहरातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. नागरिक, स्वंयसेवी,सामाजिक, राजकीय संस्था, संघटना यांनी पुरग्रस्तांना मिळेल ती मदत करीत आहेत. महानगरपालिकेकडून मदत पुरविली जात आहे. महापुरामुळे शहरातील ज्या नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे, अशा नागरिकांना घरफाळयाच्या बीलात सवलत देणे आवश्यक आहे. तरी ज्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांना घरफाळा बीलामध्ये 100 टक्के, घरात पुराचे पाणी जावून नुकसान झाले आहे त्यांना 50 टक्के सवलत देण्यात यावी, तसेच पुरग्रस्त नागरिकांनी जर यापुर्वी या वर्षीचा घरफाळा भरला असेल तर त्यांना ही सवलत पुढील वर्षीच्या घरफाळा बीलांमध्ये दयावी, अशी सूचना पत्रकाद्वारे सभापती शारंगधर देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, महापुराच्या कालावधीत केएमटी बससेवा बंद ठेवण्यात आल्याने बसच्या मासिक पासची मुदत वाढवून देण्याचा आदेश सभापती शारंगधर देशमुख यांनी आज केएमटी प्रशासनास दिले. महापुराचे पाणी शहरातील मुख्य रस्त्यावर व महामार्गावर आलेने केएमटी बसेसची सेवा बंद ठेवण्यात आली होती. केएमटीने प्रवास करणारे प्रवासी हे जास्तीत जास्त मासिक पासधारक आहेत. त्यांनाही पुराचा फटका बसला आहे. नागरिक व प्रवाशांकडून या पासची मुदतवाढ करण्याची मागणी केली जात आहे. शहरात 13 दिवस पुरस्थिती होती. बहुतांशी परिसरात या कालावधीत केएमटी सेवा नागरिकांना देता आली नाही. तरी केएमटीची सेवा पुर्ववत सुरु झालेपासून पुढे 13 दिवसांकरीता पासची मुदत वाढविण्यात यावी, असे आदेश केएमटी प्रशासनास दिले आहेत.