पुणे – निसर्ग संपदेने संपन्न पश्चिम घाट हा जागतिक स्तरावरील जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. पुणे जिल्ह्यातील एक मोठा प्रदेश या पश्चिम घाटाचा भाग आहे. याठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात विविध प्राणी-पक्षी, वनस्पतींचा अधिवास आहे.
मात्र, वाढती लोकसंख्या, विकासप्रकल्प यांचा विळख्यात अडकलेला हा अधिवास संकटात सापडला आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी त्यांचा अधिवास जपण्याची गरज वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात पाणथळ, गवताळ अशा विविध प्रदेशांमध्ये राहणाऱ्या वन्यजीवांच्या शेकडो प्रजाती आढळतात. यामध्ये विविध पक्षी, वन्यप्राणी, उभयचर प्राणी, कीटक अशा विविध प्रकारांतील प्राण्यांचा समावेश आहे.
मात्र, अलीकडील काळात या वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने त्यांच्यावर आधारित बहुतांश प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
गवताळ प्रदेशांना विकासकामांचा धोका
तरस, लांडगा, कोल्हे, चितळ यासारखे प्राणी; तर माळढोक, तणमोर यासारखे पक्षी प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने होणारी बांधकामे, शेतीचा विस्तार आणि बदलणारे स्वरूप तसेच इतर विकास प्रकल्प यामुळे गवताळ प्रदेशावर अतिक्रमण करून तो नष्ट करण्यात आला. परिणामी, या प्रदेशावर आधारित अनेक प्रजाती आज धोकादायक अवस्थेत आहेत.