नवी दिल्ली- लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 19 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीचा प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मंगळवारी झालेल्या “रोड शो’ वेळी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
पश्चिम बंगालमधील डमडम. बारासात, बासिरहात, जयनगर, मथुरापूर, जदवपूर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकात्ता या 9 लोकसभा मतदारसंघांमध्ये 19 मे (रविवारी) मतदान होणार आहे. या मतदानाच्या टप्प्याचा प्रचार उद्या (गुरुवारी) रात्री 10 वाजता थांबवण्यात येईल. उद्या रात्री 10 वाजल्यापासून निवडणूक संपेपर्यंत या मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचार होणार नाही, असे निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या मतदारसंघांमधील प्रचार शुक्रवारी संध्याकाळी थांबणार होता.
काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीमुळे राजकीय तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर महाविद्यालयातील विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्यानंतर हा हिंसाचार उसळला होता. निवडणूक प्रचारकाळात झालेल्या या हिंसाचारानंतरच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय कमिटीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यामध्ये प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशाप्रकारे निवडणूक आयोगाकडून कलम 324 नुसार प्रचार मुदतीपूर्वीच थांबवण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला असावा. कायद्याच्या दृष्टीने अयोग्य आणि हिंसाचार झाल्यास या पर्यायाचा अवलंब यानंतरही करावा लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.