कोलकाता – काही दिवसांपूर्वी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर सीबीआयची रेड पडली होती. ममता लगबगीने अभिषेक यांच्या घरी दाखल झाल्या होत्या. कुटुंबाच्या प्रमुख म्हणून धीर देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. मात्र गेल्या काही काळातील घटनाक्रम पाहता अभिषेक यांचे तृणमूल कॉंग्रेसमधील महत्व जसजसे वाढत गेले आहे, तसतशी ममतांची डोकेदुखीही वाढत गेल्याचे दिसून आले आहे.
आता तर राज्यात भारतीय जनता पार्टीने तगडे आव्हान निर्माण केले असताना ममतांच्या दृष्टीने अस्तित्वाची लढाईच निर्माण झाली आहे. अशात अभिषेक त्यांना तारणार की तापदायक ठरणार या चर्चांनाही उत आला आहे.
2011 मध्ये तृणमूल पहिल्यांदा सत्तेत आली त्यावेळी अभिषेक यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते ममतांच्या आसपास दिसू लागले. त्यावेळी त्यांचे वय होते 23. योगायोगाने डायमंड हार्बर येथील पक्षाचे खासदार सोमेन मित्रा तेव्हा नाराज होते व त्यांनी राजीनामा दिला. तेथून ममतांनी आपल्या भाच्याला रिंगणात उतरवले आणि अभिषेक खासदार झाले. त्यांचे वय होते 26.
गेल्या काही दिवसांत दोन डझन आमदारांनी आणि काही आजी माजी खासदारांनी ममतांची साथ सोडली आहे. सगळ्यांचा रोष अभिषेक यांच्यावरच आहे. अभिषेक जाहीरपणे इन्कार करत असले तरी आज पक्षातले ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.
त्यांच्या या अचानक बढतीमुळेच मुकुल रॉय या ममतांच्या खंद्या समर्थकानेही 2017 मध्ये पक्षाला रामराम केला होता. तोपर्यंत रॉय हे पक्षात ममता यांच्यानंतरचे नेते मानले जात होते. मात्र ममतांना खरा झटका बसला तो 2019 मध्ये. त्याचे कारण तोपर्यंत अभिषेक यांनी पक्षावर पकड निर्माण केली होती.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीची रणनिती तयार करण्याची जबाबदारी ममतांनी त्यांच्यावरच सोपवली होती व येथेच पक्षाचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. त्याचे कारण 2016 च्या विधानसभा निवडणुकीत जेमतेम 3 जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीने बंगालमध्ये तब्बल 18 जागा लोकसभेच्या जिंकल्या आणि तेथूनच ममतांच्या वर्चस्वाला हादरे बसण्यास सुरूवात झाली.
एकीकडे जुन्या समर्थकांत नाराजी वाढत असतानाही ममतांनी भाच्याला मात्र पूर्ण मोकळीकच दिली. त्यामुळे पक्षात चैतन्य फुंकण्यासाठी अभिषेक यांनी जेव्हा निवडणूक रणनितीकार प्रशांत भूषण यांना बंगालमध्ये आणले तेव्हा त्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाही, मात्र गळतीचे प्रमाण वाढीला लागले. गेल्या सहा महिन्यांतील चित्र पाहता पक्षातून घाऊक गळती सुरू आहे.
अभिषेक हेच ममता यांची कमजोरी असल्याचे भाजपच्या ध्यानात आल्यामुळे भाजपने एकीकडे त्यांच्या मागे इडी आणि सीबीआय लावली असताना अभिषेक यांच्यावर नाराज असलेल्यांवर गळ टाकला आणि त्याचा त्यांना लाभही झाला.
अर्थात निवडणुकीच्या राजकारणात जनताच काय घ्यायचे ते निर्णय घेत असते. 2019 च्या लोकसभेत जी मुसंडी मारली तशीच मुसंडी भाजप आता विधानसभेत मारणार का हे जनताच ठरवणार आहे. एकमात्र खरे की तृणमूलचे इतके दिग्गज नेते पक्षाच्या बाहेर गेले आहेत की भाजपला राज्याच्या सगळ्याच भागांत बस्तान बसण्यास त्याची प्रचंड मदत झाली आहे.