West bengal election 2026: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षातील नाराज नेत्यांना कडक शब्दांत सुनावले असून, “पक्षातील बंडाळी अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” असा सज्जड दम भरला आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या नेत्यांना त्यांनी जाहीर सभेतून शिस्तीचा धडा शिकवला आहे. ७४ विद्यमान आमदारांचा पत्ता कट – निवडणुकीसाठी टीएमसीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, यावेळी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. वृत्तानुसार, पक्षाने सुमारे ७४ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट नाकारले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तिकीट कापल्यामुळे पक्षात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी नेतृत्वाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. “जनता माफ करणार नाही”; ममतांची रोखठोक भूमिका – पश्चिम मेदिनीपूरमधील नारायणगड येथील सभेत ममता बॅनर्जी यांनी बंडखोर नेत्यांना स्पष्ट इशारा दिला. त्या म्हणाल्या, “प्रत्येकाला तिकीट देणे शक्य नाही. नवीन चेहऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी संधी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाविरोधात काम करणे सहन केले जाणार नाही. लक्षात ठेवा, अशा वागणुकीला जनता कधीही माफ करणार नाही. जर कुणाला असा भ्रम असेल की आपण कायमस्वरूपी उमेदवार राहू, तर ती मोठी चूक आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळेल. अन्यथा, पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.” हेही वाचा – Iran US War Update: मोठी बातमी! अमेरिका-इराण युद्धात आता भारत मध्यस्थी करणार? महिला आणि अल्पसंख्याकांवर भर – ममता बॅनर्जी यांनी यावेळी सामाजिक समतोलावरही जोर दिला. “महिला, अल्पसंख्याक आणि वंचित समाजातील घटकांना राजकारणात पुढे आणणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. नारायणगड येथील उमेदवार प्रतिभा राणी मैती यांच्या प्रचारासाठी त्यांनी ही सभा घेतली होती. बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान – पश्चिम बंगालमधील २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे, पहिला टप्पा (२३ एप्रिल): १५२ जागांसाठी मतदान. दुसरा टप्पा (२९ एप्रिल): १४२ जागांसाठी मतदान. सत्ता टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी घेतलेला हा ‘धडाकेबाज’ निर्णय पक्षासाठी फायदेशीर ठरणार की बंडखोरी वाढवणारा, हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.