मुंबई : राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा आधीच तुटवडा असताना केंद्र सरकारने इंजेक्शनच्या पुरवठ्यावरही निर्बंध आणले. केंद्र सरकारने दर दिवसाला रेमडेसिवीरचे केवळ 26 हजार वायल्स देण्याचे परिपत्रक काढले आहे. केंद्राच्या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील आव्हान वाढले आहे. यामुळे महाराष्ट्रात दररोज किमान 10 हजार रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकार काहीही करायला तयार आहे. केंद्र सरकारच्या पायाही पडायला तयार आहे, अशी कळकळीची विनंती टोपे यांनी केली आहे.
केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याची यादी जाहीर केली आहे. याविषयी राजेश टोपे यांनी, ‘केंद्र सरकारकडून राज्याला दररोज 36 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळायचे, परंतु आता कोणत्या राज्याला किती रेमडेसिवीर वाटायचे याचे नियंत्रण केंद्राने स्वतःकडे ठेवले आहे. तसे परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले आहे. त्यानुसार आपल्याला दररोज 26 हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. यामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
‘रेमडेसिवीर व ऑक्सिजन उपलब्धतेच्या कोटय़ाचे वाटप केंद्र सरकारकडे आहे. रुग्णसंख्या पाहता महाराष्ट्राला ते अधिक मिळावे. ऑक्सिजन पुरवठय़ासाठी सुरक्षित ट्रान्सपोर्ट ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केंद्राला आहे, असेही राजेश टोपे म्हणाले.
रेमडेसिवीर आयात करू शकतो का? ते पण केंद्राच्या अखत्यारीत येते. निर्यातदारांचा कोटा मिळू शकतो का? पण त्यांच्याही कोटय़ाला थेट विक्रीची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणे शक्य नाही. पेटंट अॅक्ट असल्याने केंद्राने वरिष्ठ स्तरावर अगदी पीएम स्तरावर रेमडेसिवीर बनवणाऱया कंपनीशी बोलून देशाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केली.