तरडोली येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने 75व्या वर्षी स्वत: खोदली होती विहीर
बारामती (प्रतिनिधी) – कऱ्हा नदीच्या पुरामुळे शेतजमीन वाहून गेली आहे. तसेच विहीर देखील बुजलली आहे. त्यामुळे जीवन उद्ध्वस्त झाले असून उपासमारीची वेळ आली असल्याची कैफियत बारामती तालुक्यातील तरडोली येथील पूरग्रस्त वयोवृद्ध शेतकरी किसन खंडेराव भापकर यांनी मांडली.
कऱ्हा नदीला पूर आला पुरामुळे नदीकाठच्या अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले त्यातीलच एक शेतकरी किसन भापकर यांच्या शेतीची देखील वाताहात वाताहत झाले आहे. वयोवृद्ध शेतकरी किसन भापकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी म्हणजेच गेल्या वर्षीच स्वतःच्या शेतात स्वतः टिकाव हाती घेऊन विहीर बांधली. वाढती महागाई मजुरांची टंचाई लक्षात घेऊन काही साथीदारांच्या मदतीने त्यांनी विहीर बांधण्याचे धारिष्ट्य दाखवले. दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे व त्यांच्या उत्साहात पंचक्रोशीत कौतुक झाले, असे असले तरी यंदा कऱ्हा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांनी खोदलेली विहीर भुईसपाट झाली आहे.
शेत व शेतातील पाइपलाइन देखील वाहून गेले आहे. पुराच्या घटनेला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. भापकर यांच्या शेतातील विहीर मात्र अद्याप भुईसपाट आहे. नदीच्या पुराने आलेल्या संकटामुळे वृद्ध शेतकरी भापकर सध्या हतबल आहेत. शासन दरबारी त्यांनी मदतीची याचना केली आहे. पूरग्रस्त शेतकरी म्हणून काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण विहीर गाळाने भरले असून आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी आहे. विहीर दुरुस्त करण्यासाठी आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे. त्याठिकाणी त्यांच्या नावे दीड एकर क्षेत्र आहे. मदतीसाठी त्यांनी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत यांनी मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील पाठविली आहे.
कऱ्हा नदीच्या पुरामुळे विहिर पूर्णपणे भुईसपाट झाली असून शेतीही वाहून गेली आहे, त्यामुळे माझ्या उपजीविकेचे साधन संपुष्टात आले आहे. सध्या माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माझे वय 76 वर्षे आहे त्यामुळे दुसरे कोणतेही काम करणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे शासनाकडून मी वृद्ध पूरग्रस्त शेतकरी म्हणून मदत मागत आहे. नदीला पूर आल्यानंतर तरडोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या दक्षिण बाजूच्या बंधाऱ्यावरील झडपा न काढल्यामुळे पुराचे पाणी माझ्या शेतात आले, त्यामुळे कष्टाने खोदलेली विहीर ही बुजली व शेतजमीनही वाहून गेली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
– किसन भापकर, वयोवृद्ध शेतकरी, तरडोली