नवी दिल्ली, दि. 14 -केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत -3 पॅकेजचे वाहन उत्पादकांनी स्वागत केले आहे. या पॅकेजअंतर्गत वाहन क्षेत्राला उत्पादन आधारित अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे.
वाहन क्षेत्राला उत्पादकता आधारित अनुदान देण्यासाठी 56 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतातील वाहन उद्योग बराच विकसित झाला असून जगातील इतर विकसित देशाच्या बरोबरीने आला आहे. त्यामुळे या क्षेत्राला मदत मिळाल्यास भारत या क्षेत्रात अग्रेसर राहण्यास मदत होणार असल्याचे सिआम या वाहन उत्पादकांच्या संघटनेने म्हटले आहे.
धनतेरसला वाहन विक्री वाढली
दरम्यान, दिवाळीत खरेदी करण्याची परंपरा आहे. शुक्रवारी झालेल्या धनतेरसला बऱ्याच वाहन कंपन्यांची विक्री वाढली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर हा महिना वाहन क्षेत्रासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटार या कंपनीने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, यावर्षी धनतेरसला वाहन विक्री 12 टक्क्यांनी वाढली.
ग्रामीण भागातून मागणी वाढली
करोना व्हायरसचा ग्रामीण भागावर जास्त परिणाम झालेला नाही. त्याचबरोबर चांगला पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे वाहन विक्री शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त आहे. ही बाब ध्यानात घेऊन ग्रामीण भागांमध्ये वाहन पुरवठा वाढविण्यात आला असल्याचे कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे ग्राहकांना गेल्या काही महिन्यात खरेदी करता आली नव्हती. त्यामुळे ग्राहक खरेदी करीत असल्याचे दिसून येत असल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी सांगितले. काही राज्यांमध्ये धनतेरस दोन दिवस साजरी केली जाते. या दिवशी केलेली खरेदी लाभदायक असते, असे भारतात समजले जाते.
मागणी वाढत असल्याचे मारुती, ह्युंडाई या कंपन्यांनी म्हटले आहे. सध्या वाहन खरेदीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. व्याजदर बऱ्याच कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून उलाढाल झाली नसल्यामुळे वाहन कंपन्या नव्या वाहन खरेदीवर जास्तीत जास्त प्रमाणात सवलती देत आहेत. याचा फायदा ग्राहक करून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.