नगरसेविका स्मिता कोंढरे यांचा पाठपुरावा : आरती ठाकूर सिंग यांच्या हस्ते भूमिपूजन
आंबेगाव बुद्रुक – भारती विद्यापीठ परिसर सरहद चौकात प्रभाग क्रमांक 40 च्या नगरसेविका स्मिता कोंढरे यांच्या विकास निधीतून पुणे-काश्मीर मैत्री चौक साकारत असून नुकतेच काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आरती टिकू सिंग यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या चौकामुळे पुणे-काश्मीरचा मैत्रीचा पाया भक्कम होणार असून हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई यांनी शांततेत एकत्र राहण्याचा संदेश यातून मिळत आहे, असे प्रतिपादन आरती टिकू सिंग यांनी केले.
यावेळी संजय नहार, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, आप्पासाहेब रेणुसे, विकास दांगट, संतोष फरांदे, नगरसेवक विशाल तांबे, अश्विनी भागवत, नाना जगताप, मधुकर कोंढरे, सज्जनराव पाटील, गणेश वनशिव, सरोदे,विलास भणगे, बाबुलाल कोंढरे आदी उपस्थित होते.
कसा असेल चौक
काश्मीरमध्ये शांततेचे प्रतीक मानले जाणारे चिनार वृक्ष व पुण्यातील पिंपळाचे झाड याची प्रतिकृती उभारली जाईल. तसेच, मैत्रीचे प्रतीक म्हणून काश्मिरी मुलगी व पुण्यातील मुलगी यांची शिल्प उभारून या प्रतिकृतीच्या मागे असलेल्या भिंतीवर पुणे व काश्मीरची संस्कृती रेखाटली जाईल. विद्युत रोषणाई केली जाणार आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळणीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात अनेक जातीधर्माचे लोक राहतात. अनेक प्रांत आहेत. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे.गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच वेळेला काश्मीर प्रश्नावरून देशात अशांतता निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे-काश्मीर मैत्री चौक उभारून देशाला शांततेचा संदेश देण्यासाठी एक पाऊल उचलत आहोत.
– स्मिता कोंढरे, नगरसेविका पुणे मनपा