प्रकाश राजेघाटगे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजकीय जीवनपट लेखक राधेश्याम जाधव यांनी “ट्रेल ऑफ द टायगर’ या पुस्तकरूपाने मांडला. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद संजय विष्णू तांबट यांनी केला आहे. “वाघाच्या पाऊलखुणा’ या नावाने हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. या पुस्तकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजकीय संघर्ष वाचायला मिळतो.
27 जुलै 1960 साली जन्मलेले उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख लाडाने “डिंगा’ म्हणून हाक मारत असत. मुंबईतील बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या या विद्यार्थ्याचे पुढील शिक्षण जे जे कला महाविद्यालयातून पूर्ण झाले. उद्धव ठाकरे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग केला नाही.
लोकल प्रवास करत ते कॉलेजला जात असत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मित्र अजित जयकर सोबत चौरंग ऍडव्हर्टायजिंग नावाची एजन्सी सुरू केली. याच दरम्यान डोंबिवलीतल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील रश्मी पाटणकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. उद्धव ठाकरे यांच्या सुरुवातीचे असे अनेक किस्से सांगून लेखकाने पुस्तकाची सुरुवात केली आहे.
सुरुवातीला शिवसेनेच्या मुखपत्राचे कामकाज पाहता-पाहता उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवेश सुरू झाला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 80 सभा घेऊन त्यांनी आपले राजकीय चक्र गतिमान केले. पण या काळातही आपले छंद जोपासण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. महाराष्ट्र देशा व आषाढी वारीचे हवाई छायाचित्रणांची विशेष नोंद घ्यावी लागते. युतीची सत्ता असताना त्यांचा पक्षातील वावर व राज ठाकरे यांच्या संबंधातील दुरावा लेखकाने अत्यंत सफाईदारपणे मांडला आहे.
महाबळेश्वरच्या अधिवेशनात कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड ते नारायण राणे व राज ठाकरे यांच्या पक्षांतर्गत मतभेद यावरही सखोल विवेचन पुस्तकात आढळून येते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने साथ सोडूनसुद्धा 63 जागा निवडून आणून शिवसेनाप्रमुखांचा निर्णय सार्थ ठरविला. सर्वांना विचार करायला लावणारी उद्धव ठाकरे यांची भाषणशैली करोना काळात जनतेला भावली.
2014-19 दरम्यान सत्तेत असतानाही आपल्या मित्र पक्षावर टीका करताना त्यांची जीभ कधीच अडखळली नाही. नोटबंदीवरून केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदारपणे टीका करणारे उद्धव ठाकरे भाजपाच्या विरोधी पक्षाची भूमिका सत्तेवर असूनही बजावतात अशी टीकाही त्यांनी सहन केली; पण जनतेच्या प्रश्नांवर आपली ठाकरी तोफ नेहमीच चर्चेत ठेवली. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय अंगलट येण्याची शक्यता असतानाही त्यांनी तो निर्णय घेतला, पण विधानसभेचा आराखडा बांधूनच निर्णय घेतला.
विधानसभा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आता तडजोड स्वीकारणार नाही हे स्पष्टपणे सांगितले. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करून त्यात ते यशस्वीही झाले. या सर्व घटनाक्रमाचे रोमहर्षक वर्णन अतिशय सुरेख शब्दांत लेखकाने मांडले आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जनतेसमोर नतमस्तक होऊन काम करण्याची ग्वाही देत समाजाबद्दलची कर्तव्यदक्ष भूमिका पार पाडली.
शिवसेनाप्रमुखानंतर हा पक्ष संपून जाईल असे काही व्यक्तींचे मत असताना उद्धव ठाकरे शिवसेनेचा वारू अतिशय उत्तमरीत्या चालवत आहेत. म्हणून तर “वाघाच्या पाऊलखुणा’ हे पुस्तकाचे शीर्षक सार्थ ठरते. सतत टीकेचे धनी होऊनही आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आणि संयम राखून यश संपादन करू शकतो, हीच शिकवण या पुस्तकातून वाचकांना मिळेल असा आशावाद वाटतो.