– विजय शेंडगे
संस्कार हीच आयुष्याची खरी शिदोरी. तसं तर सगळेच आई-वडील आपल्या मुलाने उज्ज्वल यश संपादित करावं याच अनुषंगाने संस्कार करतात. ते आई-वडिलांचं कर्तव्य आहे. आदर्श आई-वडिलांच्या निवडक मनोगताचा “संस्काराचे खरे शिल्पकार’ हा ग्रंथ आहे. डॉ. सुधाकर न्हाळदे हे या ग्रंथाचे संपादक. यात ज्येष्ठ लेखक गोविंद काळे यांच्यासह अनेक मान्यवरांचे लेख आहेत.
यातील लेख वाचल्यानंतर आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आई-वडील किती खस्ता खातात? कष्टाचे कसे डोंगर उपसतात? हे लक्षात येते. परंतु यातील बहुतेक पालक, मुलांना शिकवणे, डॉक्टर-इंजिनिअर घडवणे, नोकरीला लावणे, अधिकारी पदापर्यंत पोहोचवणे यातच धन्यता मानणारे आहेत. आपल्या यशाची व्याख्याच तेवढी आहे. या अनुषंगाने त्यांच्या संपादकीय लेखात डॉ. न्हाळदे यांनी व्यक्त केलेली खंत अत्यंत बोलकी आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे म्हणतात की, जे पालक आपल्या मुलांना शेती व्यवसाय करण्याचा सल्ला देऊन, मार्गदर्शन करून शेती व्यवसाय करण्यास प्रवृत्त करतात अशा आई-वडिलांचा अग्रक्रमाने सत्कार व्हावा. रा. रं. बोराडे यांची सूचना शिरसावंद्य मानून डॉ. न्हाळदे यांनी आपल्या मुलांना शेती व्यवसायासाठी परावृत्त करणाऱ्या पालकांचा शोध घेतला.
विज्ञानाने मानवी जीवन सुसह्य केले, सुखकर केले, भौतिक सुख निर्माण केली, जीवनाला वेग प्राप्त करून दिला. परंतु भूक भागविण्यासाठी अन्नाचीच गरज असते. उद्योग बंद पडले तर काही काळ आयुष्य थांबल्यासारखं वाटेल. पण कोणी शेतीच केली नाही तर जगणं अशक्य होऊन जाईल. असं असतानाही पालक आपल्या मुलाला शेती व्यवसाय करण्यास प्रवृत्त करत नाही ही बाब खेदजनक आहे.
दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही म्हणून शेतीव्यवसाय पत्करणे वेगळे आणि माझ्या मुलांना उच्च शिक्षण देऊन प्रगतशील शेतकरी म्हणून उदयास आणेल अशी स्वप्न बघणे वेगळे. हे पुस्तक वाचून पालकांनी योग्य बोध घ्यावा ही काळाची गरज आहे. ज्येष्ठ कवयित्री रूपाली अवचरे यांच्या यशोदीप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाचे मुखपृष्ठ निखिल लंभाते यांनी केले आहे.