पुणे –राज्यात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याअभावी वीज निर्मितीत अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे सुमारे 2500 ते 3,000 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यावर आता उतारा म्हणून शहरी व ग्रामीण भागातील वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन केले जाणार आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याऐवजी उकाड्यात दिवस काढण्याची वेळ आली आहे.
याबाबत महावितरणने अधिकृत माहिती दिली आहे. फेब्रुवारीपासून उष्णतेत सातत्याने वाढ झाली आहे. औद्योगिक आणि कृषिपंपांसाठी वीजवापरही वाढला आहे. त्यामुळे राज्यात 28,000 मेगावॅटपेक्षा अधिक विजेची विक्रमी मागणी सध्या कायम आहे. मुंबईवगळता राज्यात सध्या मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 4,000 मेगावॅटने वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यापासून महावितरणची विजेची मागणी तब्बल 24,500 ते 24,800 मेगावॅटवर पोहोचली आहे. विजेच्या मागणीचा चढता आलेख लक्षात घेता, ही मागणी 25,500 मेगावॅटवर लवकरच जाण्याची स्थिती आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या कालावधीत देखील 22,500 ते 23,000 मेगावॅट विजेची मागणी आहे.
औष्णिक वीजनिर्मितीत घट
देशभरात कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मितीत देखील घट झालेली आहे. तसेच काही औष्णिक संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असल्याने महावितरणला सध्या औष्णिक वीजनिर्मितीकडून तब्बल 6,000 मेगावॅटने कमी वीज उपलब्ध होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अतिरिक्त वीज मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत.
महावितरणचे आवाहन…
सध्याच्या अभुतपूर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये महावितरणला विजेच्या तुटीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिलेल्या निकषांप्रमाणे शहरी व ग्रामीण भागातील काही वीजवाहिन्यांवर आगामी काळात नाईलाजास्तव अधिकचे भारनियमन करावे लागू शकते. ग्राहकांनी सहकार्य करावे आणि विजेची मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.