पुणे -“करोना बाधितांचा दर कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता पर्यटनस्थळांवर गर्दी वाढू लागली आहे. वाढती गर्दी आणि करोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, शनिवार आणि रविवारी कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले. त्यामुळे आता शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असणार आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील करोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पवार बोलत होते. महाराष्ट्रातील करोना संसर्ग कमी होत असला तरी, सिंधूदुर्ग, रायगड, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात आजही संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील बाधित दर 5, पिंपरी-चिंचवड-5.2 तर ग्रामीणमध्ये 9 टक्के बाधित दर आहे.
त्यामुळे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड चौथा टप्प्यात आणि पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात आहे. जी शहरे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत, तेथील निर्बंध शिथिल करण्यात आली. मात्र, त्यानंतर बाजारपेठा, पर्यटनस्थळ याठिकाणी नागरिक गर्दी करू लागल्याचे दिसत आहे. ही गर्दी करोनाची तिसरी लाट ओढवू शकते.
त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन पवार यांनी केले. दरम्यान, शनिवार-रविवार बंदचा निर्णय हा एक आठवड्यासाठी असून, पुढील परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल करण्यात येईल. या निर्णयामुळे तरुण-तरुणी नाराज होतील.
परंतू, तिसरी लाट थांबवायची असेल तर हे कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. सोमवार ते शुक्रवार बाहेर पडण्यास परवानगी असली तरी, सध्या नागरिकांनी प्रवास आणि सहली टाळाव्यात अशी विनंतीही पवार यांनी केली.
…तर फिरून आलेल्यांना क्वारंटाइन करावे लागेल
“निर्बंध शिथिल झाल्यानंतर पर्यटनस्थळांसह देवदर्शन आणि ट्रेकिंगसाठी अनेक नागरिक राज्याबाहेर जात आहेत. देवदर्शन हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, ट्रेकिंग किंवा पर्यटनासाठी बाहेर जाणारे नागरिक पुन्हा शहरात येतात. त्यामुळे बाधित संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुण्यातील एखादा व्यक्ती परराज्यातून आल्यावर त्याला 15 दिवस क्वारंटाइन ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल,’ असाही इशारा अजित पवार यांनी दिला.