नवी दिल्ली – करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीमध्येही “वीकएंन्ड कर्फ्यू’ लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज ही घोषणा केली. या “वीकएन्ड कर्फ्यू’ दरम्यान अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना पास दिले जातील.
यापूर्वीच निश्चित झालेल्या विवाह समारंभांसाठी हे पास दिले जातील. प्रेक्षागृह, रेस्टॉरंट, जिम् आणि स्पा हे सर्व बंद असेल. तर चित्रपटगृहांमध्ये 30 टक्केच प्रेक्षकांना परवानगी असेल. हॉटेलमध्ये बसून पदार्थांचे सेवन करता येणार नाही. त्याऐवजी पार्सलची सुविधा सुरू असेल.
आठवडी बाजार काही निर्बंधसह सुरू असतील. प्रत्येक विभागात एकाच ठिकाणी आठवडी बाजार सुरू असेल. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय आणि धार्मिक एकत्रीकरणे होणार नाहीत. लग्नासाठी जास्तीत जास्त 50 आणि अंत्यसंस्कारासाठी 20 नागरिकांनाच परवानगी असेल.
दिल्लीमध्ये बुधवारी 17 हजार 282 रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल एका दिवसात शंभर रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.