नवी दिल्ली – करोनाव्हायरसच्या प्रसाराने फैलावलेल्या कोव्हिड19 च्या जागतिक महामारीने किमान पाच महिने सगळ्याच जगावर ‘लॉकडाऊन’ची आफत ओढवली होती. त्यामुळे सार्वजनिक समारंभ, कौटुंबिक मेळावे आणि थाटामाटात होणाऱ्या विवाह समारंभात किती माणसांनी उपस्थित रहायचे यावरही सरकारने निर्बंध आणले होते. मार्च 2020 पासून आज अखेर कोणत्याही विवाहासाठी अवघ्या 50 वऱ्हाडींना एकत्र येता येत होते, तेही अनेक अटी आणि सामाजिक अंतराचे भान राखून.
देशाच्या सर्वच राज्यांत 50 वऱ्हाडींचा नियम लागू असताना दिल्लीही त्याला अपवाद नव्हती. मात्र, कोव्हिडची साथ आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता “अनलॉक6’च्या अंतर्गत असलेल्या तरतुदींचा आधार घेत, दिल्ली सरकारने कोणत्याही विवाहासाठी 200 वऱ्हाडींना बोलावता ये ईल, असे जाहीर केले आहे.
याशिवाय मास्कचा वापर, सामाजिक अंतर, थर्मल स्कॅनिंगसह सर्व उपस्थितांची यादी त्यांच्या फोटो ओळखपत्रासह सादर करणे अशी अन्य बंधने कायमच आहेत. मात्र, 50 ची उपस्थितांची संख्या 200 वर आणण्यात आल्याने विवाहाशी निगडीत विविध प्रकारच्या 16 व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच दिल्लीच्या या तरतुदीनुसार अन्य राज्येही 50 जणांच्या उपस्थितांचे निर्बंध हटवतील, असे मानण्यात येत आहे.