कापूरहोळ – करोनाच्या पार्श्वभूमीवर 50 लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्यास परवानगी असताना जास्त वऱ्हाडी उपस्थित राहिल्याने नसरापूर (ता. भोर) येथे एका लग्न समारंभात वधू-वराला बोहल्यावर चढण्याआधी पोलीस ठाण्याची वारी करावी लागली. याप्रकरणी पोलिसांनी वधू-वरांसह त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसांनी वरासह आई-वडील, वधूसह तिचे अजोबा व काका अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत ग्रामसेवक अभय निकम यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, नसरापूर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या हॉलमध्ये सोमवारी (दि. 29) एका लग्नाचे अयोजन करण्यात आले होते. वधू-वरांच्या नातेवाइकांनी रीतसर 50 नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी काढली होती.
मात्र, परवानगीपेक्षा जास्त वऱ्हाडी उपस्थित राहिल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर राजगड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, हवालदार नितीन रावते, पोलीस नाईक सुधीर होळकर आणि गणेश लडकत यांनी सोहळ्यात जाऊन खात्री केली असता सोशल डिस्टन्सचे पालन होत नसून तिथे 150 लोक एकत्र आढळून आले. दरम्यान, नातेवाइकांनी चूक मान्य करून 50 लोकांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून मंगल कार्यालयात लग्न लावतो, अशी ग्वाही यावेळी दिली.