पुणे –देशातील काही राज्यांमध्ये जुलैमध्ये अतिवृष्टीने महापूर आणि दरडी कोसळल्या. यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे पुढील दोन महिने पाऊस कसा असेल? अशी चिंता असताना, याबाबत हवामान विभागाने “सामान्य’ पावसाच्या अंदाज वर्तवला आहे. यामुळे दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
हवामान विभागाने सोमवारी पावसाचा मासिक दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशांत बहुतांश ठिकाणी पाऊस सामान्य राहणार असून, सरासरीच्या 94 ते 106 टक्के असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली.
या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशात पावसाची सरासरी 428.3 मिमी असते. यंदा या दोन्ही महिन्यांत सरासरीपेक्षा किंचित कमी प्रमाणात पाऊस पडेल.
ऑगस्टमध्ये मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर, मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात विशेषतः किनारपट्टी भागातील जिल्हे, संपूर्ण दक्षिण भारत, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तर जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम गुजरातच्या शेवटपर्यंत सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
पाऊस यंदाही लांबणार?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पॅसिफिक महासागरात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये “ला नीना’ परिस्थिती हळूहळू प्रभावी होण्याची शक्यता आहे. या स्थितीचा प्रभाव पुढील काही महिने कायम राहू शकतो. हवामानाची ही स्थिती चांगल्या पावसाचे संकेत देते. तसेच “ला नीना’च्या प्रभावामुळे मान्सूननंतरच्या काळात बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थितीच्या निर्मितीची शक्यता अधिक असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा पाऊस दीर्घकाळ कायम राहील की नाही, हे आताच सांगता येणार नाही अशी माहिती महापात्रा यांनी दिली.