मुंबई : राज्याला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. त्यातच राज्य सरकारकडून मच्छिमार बांधवांना तात्काळ मदत घोषित केली. मात्र सरकारने केलेली मदत ही हास्यास्पद असल्याचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने म्हटले आहे. समितीच्या पदाधिकारी यांच्या बैठकीमध्ये राज्य शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.
तोक्ते वादळग्रस्त मच्छिमारांना तुटपुंज्य अर्थिक मदत जाहीर करून मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली. मच्छिमारांची राज्य सरकारने फसवणूक केली आहे अशीच भावना व्यक्त केली जात आहे.तोक्ते चक्रीवादळात 7 मच्छिमार मृत्यु/बेपत्ता आहेत, 156 मासेमारी नौका पूर्ण जाळ्या आणि मासेमारी साधनसामग्रीसह नष्ट झाल्या आहेत. तर 1027 नौकांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.
5 ते 40 लाखांपर्यंतच्या मासेमारी नौका असणाऱ्या मासेमारांना 25 हजारांची मदत आणि दुरुस्तीकरता 10 हजार रुपये, जाळ्यांच्या नुकसानासाठी सरसकट 5 हजार रुपये अशी मदत जाहीर केली आहे. ही मदत म्हणजे मच्छिमारांच्या जखमेवर चोळलेलं मीठच आहे असे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून सांगण्यात आलं आहे.
शासनाची ही मदत म्हणजे कोळी समाजाचा घोर अपमानच आहे, अशीच भावना सध्या व्यक्त केली जात आहे. गुजरातप्रमाणे केंद्र सरकारने अर्थिक मदत महाराष्ट्रालाही करावी अशी मागणी करत राज्य- केंद्र सरकारने येत्या आठवडाभरात भूमिका स्पष्ट करावी यासाठी मच्छिमार आग्रही आहेत. असं न झाल्यास 15 जून रोजी राज्यभर महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती अंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान तोक्ते चक्रीवादळग्रस्त मच्छिमारांच्या मासेमारी नौकांच्या पुनर्वसन करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थिक मदत राज्य सरकारने करावी.
-
बिगर यांत्रिक, एक दोन व तीन सिलेंडर नौकांना रूपये 3,००,०००
-
चार सिलेंडर नौकांना रूपये 5,०००००
-
सहा सिलेंडर नौकांना रूपये 1०,०००००
-
मृत्यू/बेपत्ता मच्छिमारांच्या नातेवाईकांना रूपये 10 लाख अर्थिक मदत करावी.
-
मासळी सुकविणारे, मासळी विक्रेता महिलांना रूपये 10 हजार रुपयांची अर्थिक मदत मिळावी.