गावडेवाडीच्या व्यासपीठावर वळसे पाटील-आढळराव मैत्रीला उजाळा
रमेश जाधव
रांजणी – राजकारणाच्या वेळी राजकारण करायचे असते. सर्वच गोष्टीत राजकारण करून चालणार नाही. माझे आणि वळसे पाटील यांचे आता वय झाले आहे, त्यामुळे टीका करायचे वय निघून गेले आहे; मात्र याचा अर्थ आम्ही “रिटायर्ड’ होणार असा कयास अजिबात कोणी काढू नये, असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर एकाच व्यासपीठावर शाब्दिक फटकेबाजी केली.
गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे रविवारी (दि. 6) विविध कार्यकारी सोसायटी शताब्दी महोत्सव कार्यक्रमात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजी आढळरावपाटील एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी मनमुराद गप्पा मारताना दिसून आले. भाषणावेळी आढळराव पाटील म्हणाले, एकमेकांच्या सहकार्यातून आगामी काळात विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्याबरोबरच्या एकमेकांच्या सहवासातील आठवणींनाही उजाळा दिला. एकूणच गावडेवाडी येथे आढळराव पाटील आणि वळसे पाटील हे जुने सहकारी पुन्हा एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने तालुक्यात या दोन्ही नेत्यांविषयी चांगल्याच चर्चा रंगल्या.
पूर्वीच्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू
दरम्यान शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध शिवसेना बाळासाहेब गट, भाजप आणि सर्व विरोधक असे एकत्रित पॅनल उभे होते. नुकत्याच तेथील झालेल्या जाहीर सभेत आढळराव पाटील यांच्या आरोपांच्या तोफा धडाडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गावडेवाडी येथे वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सोसायटीच्या शताब्दी कार्यक्रमात भीमाशंकर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील आणि उपाध्यक्ष ऍड. प्रदीप वळसे पाटील यांचा सन्मान देखील आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्या पूर्वीच्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली.
तुमचा खासदार आता मी नाही
या वेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे हे आढळराव पाटील यांच्याकडे कटाक्ष टाकत आपल्या भाषणात म्हणाले, दादा तुमचे आता आमच्याकडे लक्ष राहिले नाही. गावडे यांच्या वक्तव्याचा धागा पकडून यांनी राष्ट्रवादीचे खासदार डॉ .अमोल कोल्हे यांचे नाव न घेता सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले मी आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार नाही आणि आमदारही नाही तुमच्याकडे लक्ष देणारे दुसरे कोणीतरी आहे.त्यांना तुम्ही विचारले पाहिजे पण ठीक आहे मी लक्ष देत आहे. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.