नवी दिल्ली – गलवान खोऱ्यात चीन व भारतीय जवानांदरम्यानच्या रक्तरंजित झटापटीनंतर दोन्ही देशांमधील तणाव चांगलाच वाढला होता. अशातच चीनने आपले सैन्य नियंत्रण रेषेजवळ आणण्याची आगळीक केल्याने त्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील सज्ज झाले होते. मात्र आज चीनने आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या एक ते दोन किलोमीटर मागे घेतले आहे. सीमेवरील या हालचाली भारत-चीनदरम्यानचा वाद निवळण्याचे संकेत मानले जात आहेत.
दरम्यान, सैन्य मागे घेण्याबाबत चीनकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. याबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, “भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये ३० जून रोजी कमांडर स्तरावरची चर्चा झाली होती. ठरल्याप्रमाणे तणाव कमी करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळील सैनिकांकडून उपायोजना केल्या जात आहेत. दोन्ही बाजूंमध्ये जे ठरलंय, त्यावर अंमलबजावणी केली जाईल” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, आज सकाळी पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळून चीनच्या सैनिकांनी तंबू आणि अन्य बांधकाम हटवले असून गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्ष झालेल्या भागातून चिनी सैन्य मागे घेतले जात आहे. झाओ लिजियन यांनी सैन्य हटवण्याबाबत प्रतिक्रिया दिल्याने भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान ३० जून रोजी झालेली कमांडर स्तरावरील चर्चा वाद निवळण्यामध्ये महत्वाची ठरल्याचे अधोरेखित झाले आहे.