नागपूर: आघाडी संदर्भात मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून प्रत्येक मतदारसंघात निवडून येण्याची क्षमता असलेल्या मित्रपक्षातील उमेदवाराला संधी देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केली. शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पुरोगामी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकसंध ठेवू आणि एकदिलाने काम करू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेची शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील विविध भागात सुरू असून आज यात्रा विदर्भात येऊन पोहोचली आहे. या यात्रेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय पक्षातील काही पुढारी-नेते सत्ताधाऱ्यांसोबत गेले असले तरी आदरणीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांनी प्रेरित सर्व कार्यकर्ते एकसंधपणे काम करत आहेत, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.