पुणे – भारतीयांनी मुघल आणि इंग्रजांशी संघर्ष करूनही 82 टक्के लोकसंख्या हिंदू असल्यामुळे भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच आहे. मात्र, हिंदूंचे विभाजन आणि मुस्लिमांचा अनुनय करून कॉंग्रेसने राज्य केले. रामजन्मभूमी, कृष्णजन्मभूमी आणि काशी विश्वेश्वर या स्थानांवर हिंदूंचाच अधिकार असून रामजन्मभूमीच्या जागेसंदर्भात सुरू असलेला खटला जिंकू, असा विश्वास राज्यसभा सदस्य अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केला.
विश्वलीला ट्रस्टतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांच्या “आर्थिक स्वातंत्र्य-आव्हाने आणि संधी’ विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी पेशव्यांचे वंशज महेंद्र पेशवा, पुष्कर पेशवा, आमदार मेधा कुलकर्णी, आढेगाव येथील श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिक शाळेचे संस्थापक आबासाहेब कांबळे, मेजर जनरल संजय भिडे, ट्रस्टचे देवव्रत बापट, प्रवीण जोशी आदी उपस्थित होते. तिहेरी तलाक रद्द करण्याच्या निर्णयामुळे 50 टक्के अल्पसंख्याक समाज सरकारच्या पाठीशी आहे. तसेच 370 कलम रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले आहे. भारतात अशी एकही समस्या नाही, जी आपण सोडवू शकत नाही. फक्त आपण आपल्या देशातील लोकांना एखादी गोष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. लोकांना नवनवीन गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे स्वामी म्हणाले.