मुंबई : “लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावले. आता आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू,” असे म्हणत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी स्वतःसाठी अच्छे दिन आणले, पण राज्यातील १२ कोटी लोकांना बुरे दिन आणल्याचा टोलाही लगावला.
एका कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी, “लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावलं. ज्यांनी मतं दिली त्यांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं. ज्याला मतं दिलं त्याच्यासोबतची युती तोडून टाकली. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली. यांच्या एका मुख्यमंत्रीपदासाठी सर्व आमदार-खासदार नाराज आहेत. त्यामुळे जनता निर्णय करेल. हे काय कोथळा काढतात, निवडणुकीत आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू.” असा हल्लाबोल यावेळी दानवे यांनी केला आहे.
“बाकीच्यांना सोडा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अच्छे दिन मात्र नक्की आलेत. मतदारांनी भाजपा-शिवसेनेला मतदान केलं आणि आपल्याशिवाय सरकार स्थापन होत नाही हे शिवसेनेला लक्षात आलं तेव्हा त्यांनी धोका दिला. असंगाशी संगत केली.
काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. स्वतःला अच्छे दिन आले, पण या राज्यातील १२ कोटी लोकांना त्यांनी बुरे दिन आणले,” असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला.दरम्यान,आता रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेकडून काय उत्तर येते हे पाहणे गरजेचे आहे.