नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात मागच्या काही दिवसांपासून चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. त्यातच भारतीय सैन्य तुकडयांनी नियंत्रण रेषा ओलांडल्यामुळे लडाख आणि सिक्कीममध्ये तणाव निर्माण झाला असल्याचा चीनचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. उलट भारतीय सैन्य आपल्या हद्दीत गस्त घालत असताना चीनकडून अडथळा निर्माण केला जात असल्याचे आरोप भारताने केला.
सीमेवर शातंता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण देशांच्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी सर्व आवश्यक पावले उचलू असे भारताने स्पष्ट केले. नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे विधान केले. लडाखच्या गालवान व्हॅली भागात जास्त तणाव आहे. इथे दोन्ही देशांनी अतिरिक्त सैन्य तुकड्या तैनात केल्या आहेत.
लडाखमध्ये सुरु असलेल्या सीमावादात अमेरिकेने भारताला पाठिंबा दिला आहे. या संपूर्ण वादावर पहिल्यांदा भारताकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. चीनच्या कृतीमधून त्यांचा त्रास देण्याचा हेतू दिसून येतो. दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा या चकमकींवरुन चीनपासून असलेला धोका लक्षात येतो असे अमेरिकेने म्हटले आहे. दक्षिण व मध्य आशियासाठीच्या अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अॅलिस वेल्स यांनी ही टीका केली आहे.
दक्षिण चीनचा समुद्र असो किंवा भारतीय सीमा चीनची आक्रमकता फक्त शब्दांपुरती मर्यादीत नाही. चीनचे चिथावणीखोर आणि दुसऱ्यांना त्रासदायक ठरणारे वर्तन आपण पाहत आहोत. त्यातून चीनला आपल्या वाढत्या शक्तीचा नेमका कसा उपयोग करायचा आहे? हा प्रश्न निर्माण होतो,असे अॅलिस वेल्स पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.