पणजी – तौक्ते चक्रीवादळाचा फटका ज्या ज्या राज्यांना बसला आहे त्या सर्व राज्यांना आर्थिक मदत करण्याची विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करू, असे सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, गुजरातबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसला आहे. मोदींनी यापैकी फक्त गुजरातचा दौरा करून त्या राज्याला एक हजार कोटी रुपयांची मदत धनादेशाद्वारे प्रदानही केली आहे.
त्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यांना कधी मदत मिळणार असा सवाल आठवले यांना करण्यात आला होता. त्याला त्यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की,आपण तसे पत्र पंतप्रधानांना लवकरच लिहिणार आहोत.
आपण कोकणात दौरा केला असून तेथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजारांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.