बुरुंजवाडीत अधिकाऱ्यांकडून बाधित पिकांची पाहणी
शिक्रापूर (वार्ताहर) – शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करताना शासन दरबारी खासदार डॉ. अमोल कोल्हे व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्यातून पाठपुरावा करुन सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन बुरुंजवाडीच्या सरपंच पूनम टेमगिरे यांनी दिले.
महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करीत आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात झालेले असताना शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीचा पंचनामा करून मिळावा, यासाठी बुरुंजवाडी ग्रामपंचायतीने तहसीलदार लैला शेख यांना प्रस्ताव दिला होता. आज प्रशासकीय अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामे सुरु केले आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, सरपंच पूनम टेमगिरे, उपसरपंच अमोल रुके, माजी उपसरपंच विनोद टेमगिरे, कृषी अधिकारी विजय देशमुख, ग्रामसेविका कौशल्या गवळी, तलाठी अविनाश नरवडे, मोहन टेमगिरे, अरुण रुके,नवनाथ नळकांडे, रविंद्र नवले, गजानन नळकांडे यांसह आदी शेतकरी उपस्थित होते. सामान्य शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य करावे, असे यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले.