मुंबई : भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनीछत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
याविषयी बोलताना अजित पवार यांनी,”एखादं उदाहरण देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, हेच चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलनाच होऊ शकत नाही. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालयात काल बैठक पार पडली. यावेळी शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावरून टीकास्र सोडले. लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. त्यावर बोलताना “आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याठिकाणी ठेवलं होतं, त्याची आणि एकनाथ शिंदेंच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. एकनाथ शिंदेंना कुणी बंदी केलं होतं? असा सवालही अजित पवारांनी विचारला.तसेच “एकनाथ शिंदे हे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती,” असेही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा झाली. तसेच नागपूर येथील आगामी हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याची माहिती शरद पवारांना दिली.”