नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास २ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे, त्यातच शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. त्यांच्या या रॅलीला रोखण्यासाठी सरकारने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते मात्र, सरकारची हि मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही हा निर्णय पोलिसांनी घ्यावा असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
बुधवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी कोणताही आदेश देण्यास नकार दिला. “नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी प्रस्तावित ट्रॅक्टर रॅलीसंबंधी आम्ही कोणताही आदेश देणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी निर्णय घ्यायचा आहे,” असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
Supreme Court asks Centre to withdraw its plea against proposed tractor rally by farmers on Republic Day. https://t.co/PMKgitTQSV
— ANI (@ANI) January 20, 2021
“कोणत्याही मेळावा किंवा मिरवणुकीस अनुमती देणे किंवा न देणे अनियमित आणि अयोग्य आहे. आणि हा पोलिसांचा मुद्दा आहे. पोलीस याप्रकरणी निर्णय घेतील. आम्ही कोणताही आदेश देणार नाही,” असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन सुरु असताना मोर्चा न काढण्याचा आदेश शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. न्यायालयाने केंद्राला याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.