पाटस येथे खासदार सुप्रिया सुळे यांचे आश्वासन
वरवंड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दौंड तालुक्यातील संघटन चांगले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तालुक्यात आले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय दौंड तालुक्यातील विधानसभेची उमेदवारी घोषित केली जाणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.
पाटस येथे दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित मेळाव्यात खासदार सुळे बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, विरोधकांवर कधी वैयक्तिक टीका करीत नाही, धोरणात्मक टीका करते. ही लढाई वैयक्तिक नसून विचारांची आहे.
अनेक वर्षे एक कुटुंब म्हणून एकत्र काम केले. हर्षवर्धन पाटील हे माझ्या मोठ्या भावसारखे आहेत, परंतु त्यांनी माझे नाव घेऊन टीका केली म्हणून मला माझे विचार मांडावे लागणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा राग राष्ट्रवादी कॉंग्रेसवर आहे. मग तुम्ही कॉंग्रेस पक्ष का सोडला? भांडण दिराशी आणि नवऱ्याशी काडीमोड केले, असे का? असा प्रश्न खासदार सुळे यांनी उपस्थित केला.
दौंडची साखर चालत नाही का?
सरकार पाकिस्तानमधून कांदा आयात करीत आहे. हे भाजपाचे नेते रोज पाकिस्तानशी लढाई करण्याची भाषा करतात आणि आता कांदा आणि साखर पाकिस्तानमधून आणतात. यांना दौंडची साखर चालत नाही का? असा सवाल खासदार सुळे यांनी केला.
आमदार कुल यांनी दौंडला पाच पाण्याची आवर्तन देणार असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात अडीच आवर्तन मिळाली. मागील विधानसभेच्या पंचवार्षिकमध्ये चार उपकेंद्रे व दोन हजार रोहित्रे बसविण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करूनही रोहित्र उपलब्ध होत नाहीत. सध्याच्या कारभाऱ्यांनी भीमा पाटसवर चारशे कोटींचे कर्ज केले असून 19 वर्षांत सहकार साखर कारखान्याची वाट लावली.
– रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा बॅंक