रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे प्रतिपादन
मुंबई – देशात करोना विषाणुंचे काही रूग्ण आढळून आल्यानंतर त्यामुळे अनेक क्षेत्रांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रावरही त्या अनुषंगाने काही संकट उद्भवण्याचा धोका आहे. तथापी त्या स्थितीच्या अनुषंगाने आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की या अनुषंगाने काही आर्थिक संकट उद्भवले तर त्याचा मुकाबला करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे पुरेसा निधी आहे तसेच आमच्याकडे विदेशी चलनाचीही स्थिती चांगली आहे. ते म्हणाले की या विषाणुंचा प्रसार जगभरात अनेक ठिकाणी झाल्याने अनेक देशांमधील व्यापार ठप्प झाला आहे. त्याचा एकूणच जागतिक आर्थिक विकास दरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका देशाच्या आर्थिक स्थितीलाही बसू शकतो या परिस्थितीत आम्ही सर्व राष्ट्रीय कृत बॅंकांना एकमेकांशी समन्वय साधून काम करण्याचा सल्ला दिला आहे.
चीनच्या व्यापारावर देशातील जे सेक्टर अवलंबून आहेत त्यांच्यावर सध्या पेच प्रसंग ओढवला आहे. तथापी यामुळे जी एकूण जागतिक स्थिती उद्भवली आहे त्याचा भारतावर फार विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.