कराड – राज्यात सध्या भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेना सरकारने विकासाचा धडका लावला आहे. त्यामुळे अनेकांना पोटसुळ उठली असून खोक्यांची भाषा करणारेच आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, खरी परिस्थिती जनतेला माहिती आहे. मी एखादी कमिटमेंट केली; तर त्यापासून कधीही बदलत नाही. राजेंद्रसिंह यादव यांनी केलेल्या विकासकामांच्या मागणीसाठी त्यांना निधी कमी पडू देणार नसून कराडच्या विकासासाठी पन्नासच काय शंभर खोकेही देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कराड येथे आयोजित बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्यासह आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी मेळाव्यास संबोधन करताना ते बोलत होते.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. महेश शिंदे, आ. शहाजीबापू पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, पुरुषोत्तम जाधव, सुखदेव सोनावणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्वार्थासाठी हिंदुत्वाच्या विचारांशी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही हिंदुत्व टिकवण्यासाठीच हा निर्णय घेतला. आमच्या सोबत 50 आमदार, 13 खासदार सोबत आले. आतातर शेकडो नगरसेवक, सरपंच, सदस्यही सध्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही घोडदौड अशीच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहाजीबापू पाटील म्हणाले, जनतेने आम्हाला कौल दिला असताना काहींनी बाळासाहेबांच्या विचारांच्या चिंधड्या केल्या. तसेच देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी गद्दर कोण होते? हे एकदा तपासावे. दरम्यान, गुवाहाटीत सातारा जिल्हाच पहिल्यांदा पोहोचला; असे म्हटल्यावर उपस्थितांमध्ये चांगलीच खसखस पिकली. दरम्यान, आमच्या लढायला जनतेने पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, जिल्ह्याचे सुपुत्र आज मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत. त्यामुळे शिंदेसाहेब जिल्ह्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहेत. तर पालकमंत्र्यांचे कार्यकर्तृत्व हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून दिसून येते. कराडचे प्रश्न घेऊन आम्ही शिंदेसाहेबांकडे गेलो होतो. त्यावेळी त्यांनी शहराच्या विकासासाठी योगदान देण्याचे आश्वासन दिले. समाजाला आपले वाटणारे हे नेतृत्व असून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कराडचा सर्वांगीण विकास करण्यावर आमचा भर राहणार आहे.
याप्रसंगी राजेंद्रसिंह यादव यांनी पुढच्या पिढीला यशवंतराव चव्हाण कळण्यासाठी प्रीतिसंगमावर चव्हाण साहेबांच्या जीवनपटावरील चित्रफीत दाखवणारे थिएटर व्हावे, त्यांच्या जीवनावरील शिल्प असणारी भिंत उभारावी, संत सखुबाई मंदिराला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 2 कोटींचा निधी मिळावा, तसेच महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी आदींसाठी निधी देण्याची मागणी केली.
जाणता राजाने साताऱ्याचे पाणी पळवले
बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यावर बऱ्याच जणांचा पायाखालची माती सरकली आहे. त्यामुळे अनेकजण आरोप करत आहेत परंतु, आम्ही टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो. नाव न घेता जाणता राजा समजणाऱ्यांनी सातारा जिल्ह्याचे पाणी पळवले, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यातून लागेल ती ताकद देऊ, असे आश्वास आ. महेश शिंदे यांनी यावेळी केले.
दलित पॅंथरचा जाहीर पाठिंबा
दलित पॅंथरचे नेते सुखदेव सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर येत जाहीरपणे बाळासाहेबांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. तसेच सुषमा अंधारे यांच्यासह त्यांनी अनेकांचा समाचार घेतला.
==============