पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, यासाठी पाठपुरावा करू. तसेच, वकिलांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या सदस्यपदी जिल्ह्यातून निवडून आलेल्या पाच सदस्यांनी शनिवारी दिली.
ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. विठ्ठल कोंडे – देशमुख, ऍड. अविनाश आव्हाड, ऍड. अहमदखान पठाण आणि जिल्ह्यातून सर्वाधिक मते घेऊन निवडून आलेल्या ऍड. राजेंद्र उमाप यांचा पुणे बार असोसिएशनतर्फे शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत आगस्ते, उपाध्यक्ष ऍड. रुपेश कलाटे, ऍड. रवी लाढाणे, सचिव ऍड. केदार शिंदे, ऍड. मनिष मगर, खजिनदार ऍड. सचिनकुमार गेलडा, माजी अध्यक्ष ऍड. सुभाष पवार आणि त्यांची कार्यकारिणीसह वकील उपस्थित होते.
यावेळी ऍड. आगस्ते यांनी पुण्याला खंडपीठ मिळावे, या मागणीसाठी बार कौन्सिलच्या नवनिर्वाचित सदस्यांनी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली. त्यानंतर बार कौन्सिलवर निवडून गेलेल्या सदस्यांनी खंडपीठासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले. यावेळी ऍड. राजेंद्र उमाप यांच्या आई-वडिलांच्या हस्ते पुणे बार असोसिएशनला सांगली – कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 25 हजारांचा धनादेश देण्यात आला.