नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. देशात इच्छामरणाची परवानगी नसताना देखील अनेकदा अशा मागण्या झाल्या असून त्या वेळोवेळी फेटाळण्यात आल्या आहेत. मात्र, आता काही एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनीच इच्छामरणाची मागणी केल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे ही मागणी करण्यासाठी त्यांनी थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहिले आहे. यामुळे आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हे सर्व विद्यार्थी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील आहेत.
सहारनपूरमधील ग्लोकल मेडिकल कॉलेजचे हे विद्यार्थी असून 2016मध्ये त्यांनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. यंदाच्या वर्षी त्यांचे एमबीबीएस पूर्ण देखील होणार होते. मात्र, त्याआधीच या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
आपण प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाची मान्यता मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात एमसीआयने काढून घेतल्याचे या विद्यार्थ्यांना समजले आहे. त्यामुळे आपल्या भवितव्यविषयीच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या या विद्यार्थ्यांनी आपले म्हणणे मांडण्याचा सर्व स्तरावर प्रयत्न केला.
थेट उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली. मात्र, त्यानंतर देखील त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नसल्याने अखेर त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी करणार पत्र पाठवले आहे. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या एकूण 66 विद्यार्थ्यांपैकी 12 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे.
वास्तविक 2016 मध्येच एमसीआयने कॉलेजची मान्यता रद्द केली होती. मात्र, कॉलेजने विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून पाच वर्ष अभ्यासक्रम सुरूच ठेवल्याचा दावा देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वातावरण तापले असताना दुसरीकडे कॉलेजकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे.