मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहिल, असे शिवसेना आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सातत्याने सांगितले जात असतानाही दोन्ही पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्री पदावरुन वरचढीची चर्चा होत असते. परंतु, अखेर आज सामनातून शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात ठरले असल्याचे संगितले. रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?, असा सवाल शिवसेनेने उपस्थितीत केला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख?
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, नव्हे तो होईलच; पण हे काही न सुटणारे कोडे नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व आमच्यात जसे ठरले तसेच घडेल व या कोड्याचे आधीच सोडवलेले उत्तर योग्य वेळी बाहेर पडेल. तोपर्यंत भाजप व शिवसेनेच्या मंडळींनी ‘युती’च्या प्रकृतीस ओरखडा न लावता बोलत राहायचे, ‘‘मुख्यमंत्री, आमचाच बरं का! तसे दोघांत ठरले आहे!’’ युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही. रावसाहेब दानवे यांचे आभार तरी किती मानावेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचेही कोडे सोडवले आणि शिवसेनेलाही कोडे सोडवायला मदत केली. मुख्यमंत्री आपलाच! एकदा दोघांचे ठरलंय म्हटल्यावर फुकटचे वाद कशाला?