पुणे – स्वप्नांचा पाठलाग करीत महिला सक्षम बनल्या आहेत. मात्र, समाजाची पुरुषप्रधान मानसिकता काही बदललेली नाही. ती बदलण्यासाठी एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे आहे. समाजाची मानसिकता बदलायची असल्यास प्रत्येक महिलेने दुसऱ्या महिलेच्या मदतीसाठी उभे राहायला हवे. याबरोबरच पालकांनी आपल्या मुलाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका संस्थेच्या वतीने वेबिनारद्वारे डॉ. कानिटकरांची मुलाखत घेण्यात आली.
समाजात महिला हीच केवळ अत्याचाराची बळी असते, असे समजले जाते. मात्र अत्याचार करणारा हा “सिक मेल माइंड’ अर्थात आजारी पुरुषी मानसिकतेचा खरा बळी असतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी समाज म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. हा बदल लगेच होणार नाही पण, त्याची सुरुवात होणे महत्त्वाचे आहे आणि यामध्ये समाजाचे योगदान हे महत्त्वाचे ठरेल, असे डॉ. कानिटकर यांनी नमूद केले.
करोनाच्या आव्हानात्मक काळात “वंदे भारत’ मिशनदरम्यान सैन्य, हवाई दल आणि नौदलाने अभूतपूर्व एकीची झलक देशाला दाखविली. सैन्यासह देशातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आम्ही अनेक आघाड्यांवर लढलो. यादरम्यान 28 कोविड रुग्णालयांची उभारणी केली असल्याचे कानिटकर यांनी सांगितले.