मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खंत व्यक्त केली. यावरून पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी अद्यापही भाजप नेत्यांच्या मनात ताज्या दिसत आहेत.
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापती पदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्यात आलं, असं अजित पवार त्यांचं अभिनंतदन करताना म्हणाले होते. त्यावर बोलताना “अजितदादांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं?, असा टोला दरेकर यांनी लगावला. अजित पवारांच्या पायगुणाचा उल्लेख करत असताना, यांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली, ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
विधानपरिषद उपसभापती निवडीवर आमचा आक्षेप कायम आहे, अशी भूमिका प्रवीण दरेकर यांनी यावेळी मांडली.
सरकारची भूमिका हट्टाची आहे. यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे, असे असतानाही ही निवडणूक घेण्यात आली, असे दरेकर म्हणाले.