मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राने प्रचंड खळबळ उडवली आहे. त्या पत्रातून सिंह यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले होते. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले होते, याची माहिती आमच्याकडे असून वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नवाब मलिक म्हणाले कि, परमबीर सिंग यांनी पत्र लिहून कट कारस्थान केले आहे. दिल्लीहून आल्यानंतर सिंग यांनी हे पत्र लिहिले. दिल्लीत ते कुणाला भेटले? कधी भेटले? काय चर्चा केली? त्याची माहिती आमच्याकडे आहे. वेळ आली तर ही संपूर्ण माहिती उघड करू.
तसेच, 17 मार्च रोजी बदली होणार हे परमबीर सिंग यांना माहिती होते. त्यामुळे 16 मार्च रोजी त्यांनी प्रश्न विचारून विचारून त्यांच्या चॅटचे पुरावे तयार केले. सिंग यांनी पुरावे गोळा करण्याचा कट केलेला दिसतो. परंतु, सिंग यांचे आरोप गंभीर असल्याने चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांना गोवण्यासाठीच हे कुंभाड रचल्याचे परिस्थितीवरून दिसत आहे. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही. तसा निर्णयच पक्षाने घेतला आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.