पंतप्रधानांचा पाकला नाव न घेता इशारा
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्यांना हात घातला. त्यात जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात सुरू केलेल्या कारावाईचा मुद्दा महत्वाचा होता. मोदींनी दहशतवादावर बोलताना पाकिस्तानला घेरले, दहशतवादाने फक्त भारत नाही तर दक्षिण आशियातील अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांनाही उद्वस्त केले आहे. त्यामुळे दहशत पसरविण्याचं काम करणाऱ्या अशा लोकांचा नायनाट केला पाहिजे असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला नाव न घेता दिला.
काही लोकांनी फक्त भारताला नाही तर शेजारील देशांनाही दहशतवादाने बरबाद करुन टाकलं आहे. बांग्लादेश, अफगाणिस्तानही दहशतवादाशी लढतोय. श्रीलंकेत चर्चमध्ये झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या अशा लोकांना नष्ट केले पाहिजे. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्यांना उघड केले पाहिजे. जगातील सर्व देशांनी यासाठी एकत्र येत दहशतवादाचा सामना करायला हवा असे आवाहनही यावेळी मोदींनी केले.